Sunday, October 9, 2022

 अनिल परशुराम चव्हाण

वयाच्या १९व्या वर्षी मी पहिल्यांदा एन. सी. सी. मधून लोहगडावर गेलो. धाडसाची आवड आणि NCC मुळे मी गिर्यारोहणाकडे वळलो. काहीतरी नवीन करण्याच्या आवडी पोटी सह्याद्री व हिमालयाकडे आकर्षित झालो. त्यानंतर हिमालयातील लियो पुर्जियल - नविन मार्गाने (२२४१०), खनेज शिखर (१७१६०), बाउलजुरी (१९९६७), मोन चोटी (१६०९८), कानामो (१९६८२), पूर्वी सर न झालेले लौशेर (२०३५४), फ्लूटेड शिखर (२०२५८), निंगमारी (२०३७१), सेंटिनल (१८१४१) सर केले. नंदाखात (२१८१७), हाफ डोम (१९१००), सुइटिला (२१०३१) या शिखरांवर चढण्याचा प्रयत्न केला. तर स्वर्गरोहिणी १ नवीन दक्षिण मार्गाने (२०६३३) सर करण्याचा प्रयत्न केला. तसेच बारा सुक्खा खिंडीवर (१८००) तसेच  मानाच्या वायव्वे कडील (२३४०४) शिखरावर २२४४० उंची पर्यंत मजल मारली आहे.

बहुतेक मदनगड जवळील सुळका मी पहिल्यांदा सर केला. नंतर सह्याद्रीत आधी सर न झालेले बाण, सिताबाईचा पाळणा, माणिकगड लिंगी, गोसावी सुळका, कोहज किल्ल्याची लिंगी, अलंग, कुलंग, मदन जवळील सुळके यांवर प्रथम चढाई केली. राजगड प्रदक्षिणा प्रथम मारली. टकमक टोक रॅपलिंग प्रथमतः सर्वांसाठी आम्ही चालू केले.

कोणतीच मोहिम मला तशी कठिण वाटली नाही. ज्यांच्या कडून नवीन काही शिकता येते, त्या सगळ्यांनाच मी गुरू मानतो.

जागतिक तपमानवाढीचा  निसर्गावर होणार विपरित परिणाम टाळण्यासाठी जंगल वाचवले पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, असे मला वाटते.

काळानुरूप धाडस करण्यामध्ये पैसा आला आणि त्याचबरोबर प्रसिध्दी आली, त्यामुळे व्यावसायिकरण वाढले. कच्चे-लिंबू भटके नेते झाले आणि अपघात वाढले, त्यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावेत, ही अपेक्षा.

प्रत्येक मिळालेली संधी स्वीकारावी व आपल्या कुवतीप्रमाणे गिर्यारोहण चालू ठेवावे, हा मला गिर्यारोहणाने दिलेला मंत्र आहे.

कोणत्याही मोहिमेसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे महत्वाचे आहे.

स्वतःचा आत्मविश्वास, अनुभव, तुकडीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्या बरोबर पैशाचे पाठबळ आणि ध्येय हे गिर्यारोहण करताना आवश्यक असते. अनुभव हा गुरू असतो, तो बरेच काही सुचवतो आणि शिकवतो. त्यावर आपण आपले बरे वाईट निर्णय घेऊ शकतो.

माझी कमजोरी तशी काहीच नाही. पण अगोदर साधन सामुग्रीची कमतरता भासायची, परंतु त्यावाचून काही अडले नाही. 'आहे, त्यामध्ये हेतू साध्य करणे', हे ब्रीद होते. पण स्वतःची शारीरिक क्षमता वाढवून जाणे, हे आम्ही करत होतो.

अपघात झाल्यावर आपल्या काय चुका झाल्या, त्यावर मोठ्या व अनुभवी साथीदारां बरोबर बोलून नवीन गोष्टी शिकणे, मला नेहमीच योग्य वाटतात.

चंदेरीला काही वर्षांपूर्वी एका शाळेतील मुलांना गिर्यारोहणासाठी नेले होते, परतताना, प्रचंड पाऊस आला आणि पूर्ण मार्ग वेगवान पाण्याने व्यापून गेला, त्यातून मात करून आम्ही सर्वांना सुखरूप खाली आणले होते. हा प्रसंग अविस्मरणीय आहे.

इसावली (लांजा)गावातील भुयार, कोकणातील घोडेबिळ हे खूप मोठे भुयार, मालवण किल्ल्यातील विहिरीतील भुयार, ब्रह्मानंद स्वामी भुयार आदी भुयार संशोधनातील मोहिमा मी पार पाडल्या.

हॉलिडे हाइकर्स क्लब, ‘हिमालयन क्लब आणी पिनॅकल क्लब या संस्थांचा मी सभासद आहे.

स्वर्गीय अरुण सामंत माझे आवडते गिर्यारोहक होते.

राजगड तर मला आवडतोच, पण खऱ्या अर्थाने पूर्ण सह्याद्री परिसर मला आवडतो. तसेच पहिल्यांदा सर्वांसाठी सुरू केलेली टकमक टोक रॅपलिंग मोहीम देखील मला आवडते.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी सह्याद्रि मध्ये जमा होणारे कचऱ्याचे ढीग आधी थांबवले पाहिजे. आणि त्यासाठी काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

1 comment:

  1. खुप छान. थोडक्यात बरच काही लिहिलं आहे.

    ReplyDelete